महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी;श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या रुग्णालयांना सूचना

महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत सार्वजनिक गणपती, गणपती मुरवणुका याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच, कोरोनाविरोधात लढा आणि अडचणी यावरही चर्चा झाल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा झाली.
सार्वजनिक गणपती कमीत कमी बसतील त्यावर लक्ष द्यावे, आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीवर मर्यादा हवी, सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा व्हावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती, समाज प्रबोधन यावर भर द्यावा. राज्य सरकारने लोकहिताचे जे निर्णय घेतले आहेत त्याची माहिती गणेशोत्सव मंडळानी द्यावी, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली.
शेवटच्या क्षणी आलेल्या रुग्णांचं प्रमाण मृतांमध्ये जास्त आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जम्बो फॅसिलिटी खर्चिक आहे. आपल्याकडे आहे त्या ठिकाणी सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार, असंही राजेश टोपेंनी सांगितलं.
SDRF चा निधी आधी पूर्ण वापरा, जिल्हा नियोजन निधीतील 33 टक्के रक्कम वापरण्याची मुभा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे निधी कमी पडणार नाही. डॉक्टरांची संख्या कमी आहे. स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. टेली आयसीयूचा प्रयोग सहा जिल्ह्यात करतो आहे. भिवंडीत प्रत्यक्ष सुरु झाला आहे. कोव्हिडचे तज्ज्ञ डॉक्टर ऑनलाइन मार्गदर्शन यामुळे देऊ शकतात. रेमडेसेवीर इंजेक्शन्सचा परिणाम चांगला जाणवतो त्याची उपलब्धता वाढवण्याबाबत चर्चा झाली, असही राजेश टोपे म्हणाले.
वाढणार्या संख्या नियंत्रणात आणण्यासाठी संपर्क शोधणे महत्त्वाचे आहे. हे प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. टेस्टिंग वाढवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मृत्यूदर 1 टक्क्याच्या आत आणण्याच्या आमचा हेतू आहे. सगळ्यांनी मिशन मोडवर काम करण्याचे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना केले आहे.





