नांदगाव हत्याकांडातील चार जणांच्या आरोपींना शोधण्यात पोलीसांना अपयश, आता पोलिसांनी लढवली वेगळी शक्कल
नांदगाव: नांदगावच्या वाखारी येथे एकाच कुटुंबातील 4 जणांच्या हत्याकांडातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाहीय. त्यामुळे आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस प्रशासनाने 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. शिवाय आरोपींची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी वेगळी शक्कल लढवलेली आहे. एखाद्या मोठ्या आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा सुगावा लागत नसेल तर पोलीस टीव्ही, सोशल मीडिया, वृत्तपत्र, हॅन्डबिलचा वापर करून आरोपींची माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन करत आहेत. मात्र या माध्यमाऐवजी आजच्या आधुनिक युगात थेट जुन्या काळातील दवंडी देण्याच्या पद्धतीचा वापर देखील पोलीस करीत आहेत.
नांदगावच्या वाखारी येथे 2 लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आलेली होती. या घटनेला 4 दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर देखील आरोपींबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आणि याची माहिती गावागावात दवंडीद्वारे दिली जात आहे. आधुनिक व विज्ञानाच्या या युगात पोलिसांनी अवलंबलेला दवंडीचा जुना मार्ग चर्चेचा विषय ठरत आहे.
त्या रात्री नांदगावमध्ये नेमकं काय घडलं होतं?
गाढ झोपेत असलेले समाधान चव्हाण, भरताबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांचा 6 वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण आणि 4 वर्षाची आरीही चव्हाण यांचा अज्ञात मारेकऱ्यांना गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरलेला आहे. विशेष म्हणजे समाधान चव्हाण हा रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता त्याच्याकडे जास्त शेतीदेखील नाही. शिवाय त्याचे कोणाशी भांडण देखीलही नव्हतं, असं ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे खून कोणी व का केला याचे गूढ वाढलेले आहे.