#CoronaVirus: धारावीनंतर मुंबईतून कोरोनाबाबत आता आणखी एक आनंदाची बातमी
मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या मुंबईतील धारावी परिसरात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला होता. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग झोपडपट्टी भागात नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा धोका वर्तवण्यात येत होता. मात्र प्रशासनावर युद्धपातळीने केलेल्या उपाययोजनांमुळे धारावीत कोरोनाला रोखण्यात यश आलेलं आहे.
या कामगिरीचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं आहे. त्यानंतर आता मुंबई परिसरातून आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे. कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून लक्ष्य निर्धारित करुन होत असलेल्या उपाययोजना योग्य दिशेने होत आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठल्याने ते सिद्ध झालेले आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता 70 टक्क्यांपर्यंत पोहोचलेले आहे, अशी दिलासादायक माहिती समोर आलेली आहे.





