मुंबईत आजचा दिवस पावसाचा; हवामान विभागाने दिला इशारा
मुंबई | मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळल्यानंतर आजचा दिवस मुंबईसाठी पावसाचा ठरला असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचायला सुरुवात झाली असून किंग्ज सर्कल येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. मुंबईत सकाळी ९ वाजल्यानंतर अचानक हवामानात बदल झाला असून ढग दाटून मुसळधार पाऊस मुंबईत सर्वत्र कोसळत आहे. उपनगरात पावसाला अधिक जोर आहे. पूर्व व पश्चिम उपनगरात सर्व भागांत गेल्या तासाभरापासून पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई भागातही वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने सकाळी साडेनऊ वाजता पावसाबाबत अॅलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला असून पुढील तीन तासांत या जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने याआधीच चार दिवस कोकण पट्ट्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.