#CoronaVirus:महाराष्ट्राच्या मदतीसाठी केरळमधून १०० डॉक्टर्सचे पथक मुंबईला रवाना
मुंबई: राज्यात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना आता केरळ महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावून आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने केरळमधून डॉक्टर्स आणि परिचारिकांना (नर्सेस) पाचारण करण्याचा विचार बोलून दाखवला होता. यानंतर लगेचच केरळने पुढाकार घेत मुंबईतील डॉक्टर्सच्या मदतीसाठी १०० जणांचे पथक पाठवले आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसॅक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून थोड्यावेळात मुंबईत पोहोचेल. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. केरळच्या टीव्हीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संतोष कुमार या पथकाचे नेतृत्व करत आहेत. तर केरळच्या डॉक्टरांचे आणखी एक पथक अगोदरच सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती थॉमस इसॅक यांनी दिली.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे, असे काही दिवसांपूर्वीच डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. डॉ. लहाने हे राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यंत्रणेचे (DMER) प्रमुख आहेत. २५ मे रोजी त्यांनी केरळ सरकराला मदतीसाठी डॉक्टर्स पाठवण्याची विनंती करणारे पत्र पाठवले होते. यानंतर केरळकडून अवघ्या पाच दिवसांत १०० जणांचे पथक मुंबईला पाठवण्यात आले आहे.