#CoronaVirus: मोदी सरकारने गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुऱ्या- अभिजीत बॅनर्जी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Banarjee-Modi.jpg)
मोदी सरकारने लॉकडाउनच्या काळात गरीबांसाठी केलेल्या उपाय योजना अपुऱ्या आहेत असं म्हणत नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोदी सरकारने गरीबांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आखाव्यात आणि त्यांना भरीव मदत करावी असाही सल्ला बॅनर्जी यांनी दिला आहे.
काय म्हटलं आहे बॅनर्जी यांनी?
“करोनाचं संकट हे इतक्यात आपली पाठ सोडणार नाही. प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत या संकटातून सुटका होणं कठीण आहे. अशा कठीण काळात मोदी सरकारने गरीबांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात. लॉकडाउननंतरच्या काळात, पुढे काय करायचं आहे? हा प्रश्न मोदी सरकारला पडला पाहिजे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो लॉकडाउन पुकारण्यात आला आहे त्यामुळे अनेकांच्या कमाईची साधनं बंद झाली आहेत. ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अशांसाठी सरकारने भरीव उपाय योजले पाहिजेत” असंही बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
सध्या देशात आणीबाणीच
“आपल्या देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो लॉकडाउन पुकारण्यात आला आहे ती एक प्रकारे आणीबाणीच आहे. सध्या जी परिस्थिती आहे ती मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत येऊ शकते. तसे झाल्यास महागाई वाढणार हे उघड आहे. त्यामुळे या दृष्टीने योग्य तो विचार करुन सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे” असंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.