ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना राज्य सरकार देणार माफक स्वरुपातली परवानगी
राज्यभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यभरात होत असलेले उपचार व इतर गोष्टींबद्दल माहिती दिली. करोना हा आपला छुपा शत्रू असल्यामुळे त्याच्याविरोधात घरात राहूनच लढता येईल असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. लॉकडाउनच्या काळात राज्यातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. करोनासोबतच या परिस्थितीकडेही लक्ष देणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नाहीतर करोनाच्या संकटातून बाहेर पडून आपण आर्थिक संकटात पडू असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना राज्य सरकार माफक स्वरुपातली परवानगी देणार आहे. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात आहे. तर ग्रीन झोननमधील जिल्ह्यांत करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. अशा जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना राज्य सरकार परवानगी देणार आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व कच्चा माल पोहचवण्याची जबाबदारी सरकार घेईल, मात्र कामगारांची सोय ही मालकांनाच करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
कोणत्याही स्वरुपात मजुरांना प्रवास करावा लागणार नाही याची काळजी मालकांना घ्यावी लागेल. या काळात जिल्ह्यांच्या वेशी या बंदच राहणार असल्यामुळे नागरिकांना या काळात बाहेर पडता येणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी राज्यातील सर्व डॉक्टरांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. नागरिकांना या काळात ताप-सर्दी-खोकला असा कोणताही आजार असेल तर लगेच तपासणी करुन घ्यावी असं आवाहन सरकारने केलं आहे. या काळात खासगी डॉक्टरांचे दवाखानेही सुरुच असतील. याचसोबत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या तांदळाव्यतिरीक्त राज्याने गहू आणि डाळीचीही मागणी केल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.