लॉकडाऊनमध्ये विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याची अफवा; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली. देशव्यापी लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि विमान सेवाही ३ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. अशामध्ये विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याच्या अफवेमुळे मुंबईत स्थलांतरीत मजुरांनी वांद्रे स्थानकाबाहेर मोठी गेर्दी केली होती. या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणतीही विशेष ट्रेन सोडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी रात्री उशिरा ट्विट करत सांगितले की, ‘देशभरात प्रवासी रेल्वे सेवा ३ मे २०२० पर्यंत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. या दरम्यान स्थलांतरितांना गावापर्यंत सोडण्यासाठी कोणत्याही विशेष रेल्वे सोडण्याचा विचार केला नाही, असे सांगत यासंदर्भात अफवा पसरवू नका असे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
दरम्यान, अशी अफवा पसरली होती की प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी सरकार विशेष रेल्वे सोडणार आहेत. या अफवेनंतर वांद्रे स्टेशनवर आपल्या गावाकडे जाण्यासाठी उत्तर भारतीय मजुरांनी मोठी गर्दी केली होती. लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करत या लोकांनी आपापल्या घरी जाण्याची मागणी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.