11 एप्रिलला पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपविणे शक्य नसल्याचे सूचकपणे म्हटले आहे. देशात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या ५००० च्या वर गेली आहे. त्यामुळे या स्थितीत लॉकडाऊन संपवून दैनंदिन जनजीवन सुरळीत करणे शक्य नसल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या गटनेत्यांशी त्यांनी बुधवारी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या सूचक विधानामुळे १४ एप्रिलचा लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नरेंद्र मोदी येत्या शनिवारी ११ एप्रिलला पुन्हा एकदा देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. त्या दिवशीच लॉकडाऊन वाढवायचा की संपवायचा यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. देशात सध्या कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसते.
देशात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. इतरही राज्यांमध्ये हळूहळू कोरोनाबाधित रुग्ण वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी ठरणारा लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाऊ शकते. कोरोना विषाणूचे संक्रमण सुरू झाल्यापासून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.