#CoronaVirus : आज अखेर भारतात ३२ जणांचा मृत्यू, तर १०२ जणांनी केली यशस्वी मात
मुंबई| महाईन्यूज
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत (सोमवार) 1 हजार 251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1 हजार 117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर यशस्वीपणे मात केली आहे.
सोमवारी महाराष्ट्रात 216 लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.
भारत कोरोनाच्या तिसर्या टप्प्यापासून लांब
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाने अद्याप फार डोके वर काढलेले नाही. तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाही. 21 दिवसांचा लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची तातडीची योजना नाही, असे सोमवारी सरकारने सांगितले आहे. भारतीय सैन्याने पुढील महिन्यात संभाव्य आणीबाणीच्या घोषणेविषयी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली ‘बनावट’ पोस्ट नाकारलं आहे.
सोमवारी पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, भारतात संक्रमित रूग्णांची संख्या 100 ते 1000 पर्यंत पोहोचण्यासाठी 12 दिवस लागले, तर या संकटात ग्रस्त विकसित देशांमध्ये या काळात रूग्णांची संख्या 3,500 ते 8,000 इतकी होती. संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या आधारे, अग्रवाल म्हणाले की, विकसित देशांपेक्षा भारतात संक्रमणाच्या वाढीची गती कमी आहे.