#CoronaVirus: राज्यात 7 ते 8 दिवसांचा रक्तसाठा शिल्लक, रक्तदात्यांना राजेश टोपेंचं आवाहन…पहा व्हिडिओ
‘राज्यात सध्या सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं.
‘करोना’च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील रक्तसाठ्याची वस्तुस्थिती देखील सांगितली. ‘राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याच्या ब्लड बँकेचे प्रमुख थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडं केवळ सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे.
रक्त दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. रक्ताचं आयुष्य फक्त ३५ दिवसांचं असतं. केवळ ‘करोना’च्या रुग्णांसाठी नव्हे, तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये गरजेचं असतं. थॅलेसिमिया, हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. रक्ताची जागा इतर कुठलंही औषध घेऊ शकत नाही. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं,’ असं आवाहन टोपे यांनी केलं.