#ConoraVirus : जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयं बंद : उद्धव ठाकरे
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरसारख्या महानगरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व कार्यालय आणि दुकानं ३१ मार्चपर्यंत बंद करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.
फेसबुक लाईव्हवरुन राज्याला उद्देशून संवाद साधला, त्यात त्यांनी ही घोषणा केला. अन्नधान्य, दूध, मेडिकल, बँका वगळता इतर दुकानं सुरु राहतील. तर शासकीय कार्यालयात केवळ २५ टक्केच कर्मचारी उपस्थित राहतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी सरकारकडून आवश्यक पावलं उचलली जात आहे.