नव भारताच्या निर्मितीत विश्व भारती विद्यापीठाची भूमिका महत्त्वपूर्ण

कोलकाता – भारतातील लोकशाही ही प्रशासनातील उत्तम शिक्षकाप्रमाणे असून ती देशातील 125 कोटी नागरिकांना प्रेरणा देते. 2022 सालापर्यात नव भारताची निर्मिती करण्यात विश्व भारती विद्यापीठासारख्या संस्थांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावायची आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनला भेट दिली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे मोदी यांनी शांती निकेतनमध्ये स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले. याप्रसंगी त्यांनी पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संपूर्ण विश्व हे एका घरासारखे असल्याची शिकवण वेदांमधून मिळते आणि हीच मूल्य विश्व भारती विद्यापीठाच्या संस्कारांमधून दिसून येतात. गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांबद्दल जगभरात आदराची भावना आहे. आजघडीला जगभरात टागोर हा अभ्यासाचा विषय असू शकतो असे सांगत गुरुदेव हे जागतिक नागरिक होते, असे गौरवोग्ृार त्यांनी काढले.
भारतीय विद्यार्थ्यांनी आपले भारतीयत्व जपत जगभरातील विकासकामांमध्ये बरोबरीने सहभागी झाले पाहिजे असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना वाटत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या परिसरातील गावांमध्ये कौशल्य विकास आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विश्व भारती विद्यापीठाचे त्यांनी कौतुक केले. 2021 साली विद्यापीठ शकतपूर्ती साजरी करणार असून विद्यापीठाने 100 गावांपर्यंत आपली व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा पंतप्रधनांनी व्यक्त केली. बांगलादेश भवन हे भारत आणि बांगला देशमधील सांस्कृतिक भावबंधाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी बांगलादेश भवनाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
रोहिंग्याप्रश्नी भारताने मध्यस्ती करावी – शेख हसिना
रोहिंग्या शरणार्थिंच्या मुद्दा उपस्थित करत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी भारताकडे मध्यस्ती करण्याची मागणी केली. शेख हसिना म्हणाल्या, बांग्लादेशात रोहिंग्या मुस्लिम बांधवांनी आश्रय घेतला आहे. आम्ही त्यांना माणुसकीच्या नात्याने आश्रय दिला असून त्यांनी आता लवकरात लवकर पुन्हा आपआपल्या मायदेशात गेले पाहिजे. तसेच म्यानमारशी चर्चा करण्यासाठी भारताने सहकार्य करावे. म्हणजे रोहिंग्या शरणार्थिंना पुन्हा त्यांच्या देशात पाठविता येईल.





