इंद्रायणी नक्की स्वच्छ होईल, ते माझं कर्तव्यच: शरद पवार
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
‘इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची वारकऱ्यांनी केलेली मागणी ही समाजाच्या हिताची आहे. ही मागणी पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. ते नक्की पार पाडेन. याबाबत सरकारमधील संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना तशी विनंती करेन,’ असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज समस्त वारकऱ्यांना दिला.
आळंदीतील जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्यात आज शरद पवार सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवू नका, असं आवाहन नुकतंच वारकरी परिषदेनं केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सोहळ्यात शरद पवार काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, पवार यांनी यावर कुठलंही भाष्य करणं टाळलं. ‘मी प्रसिद्धीसाठी राजकारण करत नाही. तो गैरसमज आहे. कुठलाही हेतू मनात ठेवून इथं आलेलो नाही. पंढरपूर, देहू आणि आळंदीला नेहमी येत असतो,’ असं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं.
वारकऱ्यांकडून आलेल्या इंद्रायणी स्वच्छतेच्या मागणीच्या अनुषंगानं ते सविस्तर बोलले. ‘ही मागणी मला व्यक्तिश: भावलेली आहे. हे वारकऱ्यांचं वैयक्तिक काम नाही. समाजाचं काम आहे. त्यामुळं ते होईल. मी आश्वासन देत नाही. ते माझं कर्तव्य आहे. मुंबईला गेल्यावर मी या संदर्भात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री या सगळ्यांना एकत्र बोलावून याबद्दल चर्चा करेन आणि हे काम करून घेण्याबाबत सूचना करेन,’ असं ते म्हणाले. ‘जो स्वत:साठी काही करत नाही. समाजासाठी करतो, त्यांच्या मागे सरकार उभं राहत नसेल तर ते हवं कशाला,’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.