मुंडे भगिनींसह मंत्री, आमदारांची पाणी प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ

औरंगाबाद | महाईन्यूज
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासह वॉटरग्रीड योजनेचे काम सुरू ठेवण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून बोलावलेल्या ‘सर्वपक्षीय बैठकीला’ ३६ आमदार आणि सर्व खासदारांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. परिषदेला ४६ पैकी १० आमदार उपस्थित होते. २७ जानेवारी रोजी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाबाबत सरकारकडून अपेक्षा असल्याचे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, आ. नमिता मुंदडा, सुरेश धस यांच्यासह भाजपच्या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लाक्षणिक उपोषण केले होते. यापैकी बहुतांश लोकप्रतिनिधींनी आ. प्रशांत बंब यांनी रविवारी बोलाविलेल्या बैठकीला हजेरी लावली नाही.
जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये आ. बंब यांनी जि.प. अध्यक्ष, महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले होते. केवळ १० आमदार बैठकीला आल्याने बैठक उशिरा सुरू झाली होती. पाच वेळा निमंत्रण पाठवूनही अनेकांनी बैठकीला दांडी मारली आहे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असे राजकारण सुरू झाल्याचे यातून दिसते आहे. शिवसेनेचे आ. संजय शिरसाट वगळता उर्वरित आमदार भाजपचेच होते. त्यातही आ. शिरसाट बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले. आ. बंब यांच्यासह आ. हरिभाऊ बागडे, आ. सुजितसिंग ठाकूर, आ. अतुल सावे, आ. मेघना बोर्डीकर, आ. संतोष दानवे, आ. राजेश पवार, आ. अभिमन्यू पवार, आ. राम पाटील रातोळीकर, औरंगाबाद जि.प.च्या अध्यक्षा मीना शेळके यांची उपस्थिती होती.





