भारताचा धिमा विकास जागतिक आर्थिक सुस्तीमागील मोठे कारण : ‘आयएमएफ’चे मत
दावोस | आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने (आयएमएफ) सोमवारी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अनुमानित आर्थिक वृद्धिदरात घट केली. २०१९-२० वित्तवर्षासाठी भारताच्या विकासदराचा अंदाज ६% वरून ४.८% केला. त्यामागे वित्तीय संस्थांवरील संकट, ग्रामीण उत्पन्नात वाढ न होणे हे मुख्य कारण आहे.
आयएमएफने म्हटले की, ‘भारताचा विकासदर खुंटल्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. यामुळे जागतिक वृद्धिदराचाही अंदाज घटवण्यात आला आहे. भारताचा धीमा विकास हे जागतिक सुस्तीमागील मोठे कारण आहे.’ तथापि, आयएमएफने २०२०-२१ मध्ये भारताचा विकासदर ५.८% आणि २०२१-२२ मध्ये ६.५% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. संस्थेने चीनसाठी २०२० मधील विकासदराचा अंदाज ०.२०% ने वाढवत ५.८% वरून ६% केला. जागतिक विकासदर घटला : आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ म्हणाल्या, भारतामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धिदरात २ वर्षांसाठी अनुक्रमे ०.१% व ०.२% कपात करण्यात आली आहे.