साईजन्मभूमीबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री मागे घेत नाहीत तोपर्यंत शिर्डी बंद राहणार..शिर्डीकरांनी घेतली भूमिका…
शिर्डी |महाईन्यूज |
साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थान म्हणून ओळख नको, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी घेतला आहे.
शिर्डीकरांनी रविवारपासून म्हणजेच बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले आहे. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, साई मंदिर सुरू राहणार आहे. पण, वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली आहे.
पाथरी ही साईजन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री मागे घेत नाहीत तोपर्यंत रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. भाविक आपल्यासाठी देवच आहे, त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, साई मंदिर सुरू राहणार आहे.
पाथरीला निधी देण्यास विरोध नसून त्याचा साई जन्मभूमी उल्लेख करण्यास आमचा आक्षेप आहे, अन्य आठ जन्मस्थळाच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे ग्रामसभेत सांगण्यात आले. रविवारी सकाळी शिर्डी ग्रामस्थांनी द्वारकामाई येथे जमून शहरातून परिक्रमा काढण्याचे ठरवले असून, यामध्ये साईचरित्रातील ओव्यांचे फलक हातात घेऊन साईजन्मभूमीबाबत कुठेही उल्लेख नसल्याचा संदेश देणार आहे.