उत्तरप्रदेशातील किमान सहा आमदारांना खंडणीसाठी धमक्या
लखनौ – उत्तरप्रदेशातील किमान सहा आमदारांना खंडणीसाठी धमक्या आल्या आहेत. अशी तक्रार त्या आमदारांनीच सरकारकडे केली आहे. दहा लाख रूपये द्या नाहीं तर तुमच्या कुटुंबियांना ठार मारले जाईल असे या आमदारांना फोनवर धमकावण्यात आल्याचे या आमदारांनी म्हटले आहे. या प्रकरणात त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
गेले दोन दिवस फोनवरून या धमक्या मिळत असल्याचे या आमदारांनी म्हटले आहे. एकाच व्यक्तीने या सहाही आमदारांना धमकी दिल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वीर विक्रमसिंह, प्रेम नारायण पांडे, विनयकुमार द्विवेदी, विनोद कटियार, शशांक त्रिवेदी, आणि अनिता राजपूत अशी धमक्यांचे फोन आलेल्या आमदारांची नावे आहेत. काही जणांना व्हॉट्स ऍप वर या धमक्या आल्या आहेत.
कॉल नोंदीवरून या इसमाचे नाव अलि बुधेश भाई असे आहे आणि तो दुबईचा रहिवासी आहे. केवळ खोडसाळपणातून हा प्रकार करण्यात आला असावा असा कयास आहे. तथापी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू केली आहे. राज्याचे पोलिस महासंचालक प्रविणकुमार यांनी सांगितले की स्पेशल टास्क फोर्सच्या सहाय्याने आम्ही ही केस सोडवू आणि संबंधीताला लवकरच गजाआड करू. या आमदारांच्या सुरक्षेचे चोख प्रबंध करण्यात आले असून लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाहीं असेही पोलिसांनी म्हटले आहे.