‘त्या’ गावात विराट-अनुष्काला कोणी ओळखलंच नाही
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. त्यामुळेच हे दोघे जेव्हा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसतात तो चर्चेचा विषय ठरतो. सध्या हे दोघंही भूतानमध्ये त्यांचा क्वालिटी टाइम एकत्र घालवत आहेत. विशेष म्हणजे जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या जोडीला भूतानमधील एका कुटुंबियांनी ओळखलंच नाही. इतकंच नाही तर एखाद्या सामान्य पाहुण्यांचं ज्याप्रमाणे स्वागत केलं जातं तसंच स्वागत या कुटुंबियांनी विरुष्काचं केलं. परंतु या कुटुंबियांनी केलेलं स्वागत विरुष्काला प्रचंड आवडलं असून अनुष्काने या कुटुंबियांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“आज आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ८.५ किमीचा टप्पा पार केला. यामध्ये एका गावातील काही पाळीव प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी आम्ही थोडा वेळा थांबलो होतो. या पाळीव प्राण्यांमध्ये काही लहान पिल्लंदेखील होती. त्यातच एक पिल्लू तर प्रचंडच लहान होतं. म्हणजे अगदी त्याचा जन्म चार महिन्यांपूर्वीच झाला आहे. या पिल्लासोबत खेळत असताना त्यांच्या मालकाने आमची विचारपूस केली. इतकंच नाही तर तुम्ही थकला आहात का? चहा पिणार का? असंही विचारलं. विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला ओळखलंच नाही, त्यांना माहितच नव्हतं की आम्ही कोण आहोत,”असं अनुष्काने सांगितलं.
पुढे ती लिहीते, “या कुटुंबातील सगळ्याच सदस्यांनी आमच्यासोबत मस्त गप्पा मारल्या. ते केल आम्हाला ट्रेकर्स समजत होते आणि ट्रेकिंग करुन आम्ही थकलो आहोत हेच त्यांना माहित होतं. आयुष्याचा खरा अर्थ काय हे मला नेमकं माहित नाही, मात्र या कुटुंबाची ही एक आठण आहे जी आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू”.
दरम्यान, अनुष्काने केलेल्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याच्यावर कमेंट करत या कुटुंबाचं कौतुक केलं. नुकताच विराटने त्याचा वाढदिवस साजरा केला.