नक्षलवाद्यांशी लढताना दोन जवान शहीद
झारखंडची राजधानी रांची येथे नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. रांचीपासून जवळपास ४० किलोमीटर दूर जंगलात ही चकमक झाली. हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
चकमकीत झारखंड जग्वारचे दोन जवान शहीद झाले, शिवाय अन्य जवानही जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रांचीचे एसएसपी अनीश गुप्ता, डीआयजी एवी होमकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जवानांना नक्षलवाद्यांच्या ठिकाण्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार परिसरात शोधमोहीम राबवली जात होती. दरम्यान लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात दोन जवान शहीद झाले तर अन्य जवान जखमी झाले. जवानांकडूही नक्षलवाद्यांना चोख प्रतित्युत्तर देण्यात आले आहे.
या घटनेवर मुख्यमंत्री रघुवर दास यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, मी त्या दोन जवानांना सलाम करतो, जे आज नक्षलवाद्यांशी लढत असताना शहीद झाले. झारखंडमध्ये नक्षलवाद आपली शेवटची घटका मोजत आहे. नक्षलवादाचे मुळासकट उच्चाटन केल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत.