सर्वत्र भारताच्या ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयाचीच चर्चा : पंतप्रधान
काहीजण भारताच्या सामर्थ्यावर संशय घेत आहेत. त्यांना असं वाटतंय की भारत मोठी उंची गाठू शकत नाही, त्यामुळेच आम्ही देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले असून सध्या सगळीकडे याचीच चर्चा सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे जाहीर सभेत बोलताना म्हटले.
काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात आम्ही ५ ट्रिलिअन डॉलरचे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम केले आहे. तसेच यासंदर्भातील निर्णयांची घोषणाही केली. आम्ही पुढील दहा वर्षांचे व्हिजन गाठण्यासाठी पाऊल टाकण्याचा आत्मविश्वास दाखवला. त्यानुसार, आपण पुढील पाच वर्षात नक्कीच ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठू असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. आम्ही ५ मिलिअन डॉलरचे ध्येय नक्कीच गाठू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. मात्र, काही जण यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत, जाणीवपूर्वक निराशेचे वातावरण पसरवणारे हे लोक आहेत, अशा शब्दांत त्यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली.