राज्यघटनेवर हल्ला; देशात भीतीचे वातावरण
- राहुल गांधी यांची केंद्रावर जोरदार टीका
रायपूर – राज्यघटनेवर जोरदार हल्ले होत असून देशात भीतीचे वातावरण पसरले आहे, अशा शब्दामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. देशातील परिस्थिती पाकिस्तानसारखी आणि आफ्रिकेतील काही देशात असलेल्या हुकुमशाहीसारखी झाल्याची टीकाही त्यांनी केली. कर्नाटकातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभुमीवर छत्तीसगडमध्ये एका सभेमध्ये त्यांनी ही टीका केली. सर्वोच्च भाजपचे नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्या शपथविधीला स्थगिती द्यायला न्यायालयाने उत्तररात्री झालेल्या सुनावणीत नकार दिल्याच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संथांशी संबंधित 73 आणि 74 व्या घटनादुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जन स्वराज्य सम्मेलनामध्ये ते बोलत होते.
देशातील न्यायव्यवस्थेला दबावाखाली ठेवून धमकावले जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी जानेवारी महिन्यात अचानक बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सरन्यायाधीशांच्या कामकाजाच्या शैलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्या संदर्भाने राहुल गांधी यांनी हा आरोप केला.
कर्नाटकात आमदार एका बाजूला आणि राज्यपाल दुसऱ्या बाजूला आहेत. तेथे आमदारांना फोडण्याचे प्रयत्न चालू आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांना 100 कोटी रुपये दिले जात असल्याचा आरोप “जेडिएस’चे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी केल्याच्या संदर्भाने ते बोलत होते.
भाजप भ्रष्टाचाराबाबत बोलायचे असेल तर राफेल विमान खरेदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पुत्राबाबत आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या कंपनीबाबत बोलावे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले. मात्र या प्रकरणांमधील गैरव्यवहाराच्या तपशीलाबाबत ते काहीही बोलले नाहीत.
हत्या प्रकरणातील आरोपी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असल्याचे चित्र यापूर्वी 70 वर्षात कधीही दिसले नव्हते, असे म्हणून त्यांनी अमित शहा यांनाही लक्ष्य केले. भाजप आणि संघ मिळून देशातील लोकशाही संस्था ताब्यात घेत आहेत. एकापाठोपाठ एक खासदार, आमदार आणि नियोजन आयोगांसारख्या संस्था ताब्यात घेतल्या जात आहेत. या संस्था सामुहिकपणे देशाचा आवाज आहेत. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. या संस्थांमध्ये संघ आपली माणसे घुसवत आहेत. दलित, आदिवासी आणि महिलांचा आवाद दडपला जात आहे आणि सर्व संपत्ती काही निवडक लोकांमध्ये वाटली जात आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे सरकारचे धोरण नाही, असे अर्थमंत्री सांगतात. मात्र गेल्या वर्षभरात 15 श्रीमंतांचे 2.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले गेले आहे असल्याचा आरोपही राहुल यांनी केला.
न्यायपालिका आणि माध्यमेही भीतीच्या छायेत
न्यायपालिका आणि प्रसार माध्यमेही भीती आहे. भाजपच्या खासदारांनाही पंतप्रधानांच्या आगोदर एक शब्दही बोलता येत नाही. गेल्या 70 वर्षांपासून न्यायासाठी न्यायपालिकेकडे दाद मागितली जायची. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपले कर्तव्य पार पाडता येत नसल्याने जनतेच्या सहाय्याची गरज भासते. अशी स्थिती हुकुमशाहीमुळेच निर्माण होते. पाकिस्तान आणि आफ्रिकेतल्या देशांमध्ये असे होत असे. मात्र भारतामध्ये अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.