सिंधुदुर्गातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ६ कोटींचा निधी मंजूर
मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – कनेडी मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवर असलेल्या मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने तत्काळ ६ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. गेल्या महिन्यातील मुसळधार पावसात या पुलाचा काही भाग कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे हा तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील महिन्यात २१आणि २२ जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील अनेक रस्ते तर कणकवली – कनेडी (सागवे) मार्गावरील नाटळ मल्हारी पुलाचा काही भाग कोसळला होता. हा पूल ५७ वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. हा पूल कोसळल्याने नाटळ, नरवडे,दिगवळेसह १० गावांचा संपर्क तुटला होता.
त्यामुळे माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी या पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती.त्याची तत्काळ दखल घेत चव्हाण यांनी तातडीने या पुलाची पुनर्बांधणीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आपल्या बांधकाम विभागाला दिले आणि या प्रस्तावानुसार त्यासाठी ६ कोटींचा निधीही मंजूर करून दिला.त्यामुळे आता कणकवली तालुक्यातील कनेडी(सागवे), वाडोस,शिवापूर,सांगेली, धवडकी,दाणोली,शिरसिंगे कुपवडे,कलंबीस्त,वेर्ले आणि बांदा रस्त्यावरील गावांची दळणवळण परिस्थिती पूर्वपदावर येणार आहे.