50 लाख देतो मुख्यमंत्री योगी खूर्ची सोडणार का? हाथरस पीडितेच्या काकाचा संतप्त सवाल
उल्हासनगर | उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 50 लाख देतो त्यांनी खूर्ची सोडावी, अशी संतप्त प्रतिक्रिया हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचे मोठ्या काकांनी दिली आहे. योग्य आदित्यनाथ सरकारवर आपला विश्वास नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते उल्हासनगर येथे राहातात. मात्र, रेल्वे तिकीट न मिळाल्यानं गावी जाता आलं नाही, अशी खंतही त्यांनी ‘एका मराठी वृत्त वाहिनीशी ‘ बोलताना व्यक्त केली.
योगी सरकारनं पीडित कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यावर पीडितेच्या काकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उल्हासनगर शहरात राहणारे पीडितेचे मोठे काका, चुलत भाऊ यांनी अखिल भारतीय नवयुवक वाल्मिकी संघाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता.
आमच्या मुलींवर बलात्कार करून हत्या केली.तिला अग्नी देण्याचा अधिकार पण पोलिसांनी हिरावून घेतला. त्या पोलिसांना आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय हे दुष्कर्म करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. यावेळी ‘उत्तर प्रदेश पोलिस मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या.
पीडितेचे काका गेल्या 35 वर्षांपासून आपल्या परिवारासह उल्हासनगरच्या वाल्मिकीनगर भागात राहतात. मात्र, रेल्वेचं तिकीट न मिळाल्यानं हाथरसला जाऊ शकलो नाही, अशी खंत पीडितेचे काका आणि चुलत भावांनी व्यक्त केली आहे.