देशात 24 तासांत 41 हजार 831 नवे कोरोना रुग्ण, 541 कोरोनाबळी
नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 41 हजार 831 नव्या रुग्णांची भर पडली असून 541 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 39 हजार 258 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. यासह देशात आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 55 हजार 824 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 4 लाख 24 हजार 351 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 8 लाख 20 हजार 521 इतकी झाली आहे.
दरम्यान, राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून नऊ हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल शनिवारी 6 हजार 959 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर 7 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 60 लाख 90 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के इतके आहे. राज्यात काल 225 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 76 हजार 755 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (72), वाशिम (86), गडचिरोली (15) या चार जिल्ह्यांत ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 100च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 674 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.