4 मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय नाही- केंद्र सरकार
सरकारी विमान सेवा कंपनी एअर इंडियाने ४ मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारकडून विमान सेवा सुरु करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी याबाबत ट्विट केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरु करायची याबाबत केंद्र सरकारचा निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत काही घोषणा झाल्यानंतरच विमान कंपन्यांनी आपले बुकिंग सुरु करावे, असे त्यांनी सांगितले आहे.
गुरुवारी एअर इंडियाने ४ मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याचे संकेत दिले. एवढेच नाही तर १ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्यासही एअर इंडिया सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील देशव्यापी लॉकडाउन ३ मे ला संपुष्टात येणार आहे. लॉकडाउनचा कालावधी संपण्यापूर्वी एअर इंडियाने ठराविक मार्गावरील देशांतर्गत तिकीट आरक्षण खिडकी खुली केली.