धक्कादायक..! महाराष्ट्रात वर्षभरात २२ हजार ७४६ आत्महत्या
मुंबई : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने २०२२ सालासाठी वार्षिक रिपोर्ट जाहीर केला आहे. भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांच्या ताज्या अहवालानुसार, २०२१ सालच्या तुलनेत २०२२ मध्ये जास्त आत्महत्या झाल्या आहेत. २०२२ मध्ये देशात तब्बल १ लाख ७० हजार ९२४ लोकांनी आत्महत्या केली आहे. महराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी आयुष्य संपवल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
महाराष्ट्रात वर्षभरात सर्वाधिक म्हणजेच २२ हजार ७४६ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये १९ हजार ८३४ लोकांनी आत्महत्या केली. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यांचा नंबर लागतो. महाराष्ट्रात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे १९४१ आत्महत्या, त्यानंतर कर्नाटकात १३३५ आणि आंध्र प्रदेशात ८१५ आत्महत्या झाल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालातून राज्यातील लाजिरवाणी आकडेवारी उघड झाली आहे.
हेही वाचा – पुण्यात स्कूलबस अपघाताचा थरार; विद्यार्थ्यांनी भरलेली भरधाव बस झाडावर आदळली
उत्तर प्रदेशात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद
२०२२ मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक हत्येच्या एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. उत्तर प्रदेशात या प्रकरणांमध्ये ३४९१ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. यानंतर बिहार दुसऱ्या क्रमांकावर असून इथे २९३० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तसेच महाराष्ट्र या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून २२९५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीये. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशात १९७८ आणि राजस्थानमध्ये १८३४ हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झालीये. देशभरातील एकूण हत्येच्या गुन्ह्यांपैकी ४३.९२ टक्के गुन्ह्यांची नोंद या पाच शहरांमध्ये झालीये.
महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर कोणतं?
एनसीआरबीच्या रिपोर्टमधून महिलांसाठी सर्वात असुरक्षित असलेल्या शहराचे नावही जाहीर झाले आहे. दिल्लीमध्ये २०२२ साली १२०४ अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. एनसीआरबीच्या या रिपोर्टमध्ये १९ महानगर शहरांमधील रिपोर्ट केल्या गेलेल्या ४८ हजार ७५५ प्रकरणांचा उल्लेख आहे. त्यात दिल्लीमध्ये सर्वाधिक १४ हजार १५८ प्रकरणं समोर आली आहेत. तर त्यानंतर मुंबईत ६१७६ गुन्ह्यांची नोंद झाली.