‘भेसळखोरांवर कारवाई करताना राजकीय दबाव नाही’; तुकाराम मुंढे

Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने राज्यात भेसळखोरांवर धडक कारवाया करण्यात येत आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अनेक ठिकाणी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात कारवायांचा धडाका सुरू आहे. राज्यभरात विविध ठिकाणी भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट दर्जाचं जेवण, गुटखा विक्रीवर छापे अशा अनेक मोठ्या कारवाया एफडीएकडून करण्यात आल्या आहेत.
सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाचं राज्यभरातून कौतुक केलं जात आहे. मात्र, भेसळखोरांवर कारवाया करताना किंवा एखाद्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर कारवाई करताना कधी राजकीय दबाव येतो का? याबाबत बोलताना तुकाराम मुंढेंनी पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. ‘एफडीएची (FDA) जबाबदारी हाती घेतल्यापासून मला एकाही कारवाईबाबत कोणाचाही फोन किंवा मेसेज आला नाही’, असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं आहे.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर कारवाई करत असताना कधी राजकीय दबाव येतो का? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “सिस्टम आहे आणि सिस्टममध्ये प्रेशर असतात. मात्र, त्यामध्ये काम करण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे. आता एखादा व्यक्ती त्यावर वेगळ्या पद्धतीने वागणं किंवा त्यावर मी वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देईल हा भाग त्यामध्ये आला. कुठेही काम करत असताना प्रेशर नाही असं होत नाही. पण म्हणून त्याचा बागुलबुवा करायचा का हे आपल्यावर असतं. माझी सवय प्रतिसाद देण्याची आहे, लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याची नाही. मी कदाचित रिअॅक्शन लगेच देत नाही”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं.
हेही वाचा – संत साई इंग्लिश मिडीयम हायस्कूल भोसरी येथे क्रांती दिन जल्लोषात साजरा
राजकीय दबावाबाबत तुकाराम मुंढे काय म्हणाले?
“अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मला एकाही कारवाईच्या बाबतीत, म्हणजे कारवाई करा किंवा कारवाई करू नका, असा कोणाचा मेसेज किंवा फोन देखील आलेला नाही. कोणाचाही फोन आलेला नाही”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील चायनीज फूड स्टॉल FDA च्या रडारवर?
तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एका मुलाखतीत बोलताना राज्यातील चायनीज फूड स्टॉलबाबत एक मोठा इशारा दिला. तुकाराम मुंढे यांनी म्हटलं की, “आधी पुण्यातील बापट रोड किंवा पाषाण रोडवर चायनीजच्या गाड्या असायच्या. मी असा विचार करतोय की आता तिथे जाऊन जरा बघावं का? तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, मी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज फूड तिथेच खाल्लेलं आहे. अन्यथा तोपर्यंत चायनीज फूड काय आहे हे मला देखील माहिती नव्हतं. भारत-चीन युद्ध वैगेरे असा अभ्यास मी केला होता. मात्र, चायनीज फूडचा असा कोणता अभ्यास केला नव्हता. पण आता चायनीज फूडचीही खूप डिमांड आहे. गेल्या दोन महिन्यांत एफडीएकडून खूप कारवाया झालेल्या आहेत. त्यामुळे लोक मला सांगत आहेत की चायनीज फूडकडेही थोडं लक्ष द्या. त्यामुळे आता चायनीज फूडकडेही थोडं लक्ष द्यायचं आहे”, असा सूचक इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.





