“शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार?” अजित पवारांचे विधान वादात

Ajit Pawar | शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. निवडणुकांच्या काळात महायुती सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनानुसार निर्णय घेण्याची मागणी शेतकरी नेत्या बच्चू कडू यांनी जोरदारपणे केली. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसह नागपूरपर्यंत मोर्चा काढला होता. अखेर बुधवारी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षी ३० जूनपर्यंत कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेण्याचा शब्द बच्चू कडूंना दिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेलं विधान वादात सापडलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
कर्जमाफीबाबत जूनला निर्णय घ्यायचं ठरलंय. तो कसा होईल ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्हीसुद्धा शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे परत करण्याची सवय लावा ना. सारखंच फुकटात, सारखंच माफ.. कसं व्हायचं? असं चालत नाही. एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्र फडणवीसांनी दिली, एकदा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आम्ही दिली, आता पुन्हा आम्हाला निवडून यायचं होतं, म्हणून सांगितलं आम्ही माफ करू. लोक म्हणतात तुम्ही सांगितलं होतं माफ करू, आता करा माफ, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : मुंबई महापालिकेतील पैशांसाठी ठाकरे बंधू एकत्र; शिंदे गटातील नेत्याची टीका
दरम्यान, अजित पवारांच्या विधानावर राजू शेट्टी यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी काही भीक मागत नाही. मला अजित पवारांचं मान्य आहे. पण त्यासाठी आधी सरकार म्हणून अजित पवारांनी एक व्यवस्था करावी. महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकण्याची वेळ येणार नाही अशी धोरणं सरकारनं तयार करावीत. त्यांच्याकडे वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही काय भिकारी नाही, असं राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या वतीने अजित पवारांना म्हणाले आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





