Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र एकवटणार…! राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली; दोन ऐवजी एकच मोर्चा, शिवसेनेला चर्चेसाठी प्रस्ताव

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेचा सक्तीने समावेश करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्रात तीव्र विरोध होत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

यापूर्वी 6 जुलै 2025 रोजी नियोजित असलेला त्रिभाषा सूत्राविरोधी मोर्चा आता एक दिवस आधी, म्हणजेच शनिवार, 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे. यासोबतच, दोन स्वतंत्र मोर्चांऐवजी एकच संयुक्त मोर्चा काढण्यासाठी मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) पक्षाशी चर्चा सुरू केली आहे. राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि मराठी जनतेला या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मराठीच्या रक्षणासाठी आणि हिंदीच्या सक्तीविरोधात 6 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी एका निवेदनाद्वारे मोर्चाची तारीख बदलून 5 जुलै असल्याचे जाहीर केले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे:

“सस्नेह जय महाराष्ट्र!

आज सकाळी आपल्या मराठीनिष्ठेसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी 6 जुलै रोजी मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात आता बदल आहे. हा मोर्चा रविवार, 6 जुलैऐवजी शनिवार, 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. ठिकाण आणि इतर तपशील पूर्ववत राहतील. माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने या बदलाची नोंद घ्यावी.

आपला नम्र, राज ठाकरे.”

हेही वाचा –  2 हजार एसटी निघणार भंगारात; एसटी महामंडळाचा निर्णय

पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) पक्षाशी संयुक्त मोर्चासाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. “हिंदीच्या सक्तीविरोधात हा मोर्चा आहे. यात सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि मराठी माणूस सहभागी व्हावा. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशीही आम्ही बोलू. आमची माणसं त्यांच्या नेत्यांशी संपर्क साधतील. कोणत्याही राजकीय वादापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी भाषा मोठी आहे. 5 जुलैला हे सर्वांना दिसेल,” असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

त्रिभाषा सूत्राविरोधी समन्वय समितीने यापूर्वी 7 जुलै रोजी मोर्चाचे आयोजन जाहीर केले होते, ज्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यानंतर मनसेने 6 जुलै रोजी स्वतंत्र मोर्चाची घोषणा केली होती. मात्र, दोन स्वतंत्र मोर्चांमुळे मराठी अस्मितेचा संदेश कमकुवत होऊ नये, यासाठी मनसे, शिवसेना (उबाठा) आणि त्रिभाषा समन्वय समिती यांच्यात एकच संयुक्त मोर्चा काढण्याबाबत चर्चा सुरू आहे.

सूत्रांनुसार, मनसेचे नेते शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधून यासंदर्भात प्रस्ताव ठेवणार आहेत. या संयुक्त मोर्चामुळे मराठी भाषेच्या रक्षणासाठी एकजुटीचा दमदार संदेश दिला जाईल, अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत पहिलीपासून हिंदी भाषेचा सक्तीने समावेश करण्याच्या प्रस्तावाने महाराष्ट्रात असंतोष पसरला आहे. मराठी भाषेचे महत्त्व आणि स्थानिक भाषांना प्राधान्य मिळावे, यासाठी राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “हिंदीच्या सक्तीमुळे मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे नुकसान होईल. हा लढा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आहे. मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळणार नाही, यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे,” असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिंदीच्या सक्तीविरोधातील हा मोर्चा केवळ भाषेच्या मुद्द्यापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेच्या रक्षणाचा लढा आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीही मराठी भाषा, स्थानिक हक्क आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आंदोलने केली आहेत. या मोर्चाद्वारे मराठी जनतेला एकत्र आणून केंद्र सरकारला ठोस संदेश देण्याचा त्यांचा मानस आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button