‘राज ठाकरेंनी एका जागेवर पाठिंबा मागितला आहे’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. माहीत मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर महायुतीकडून सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. महायुतीचा उमेदवार माघार घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांचीही याला मान्यता होती की तिथे उमेदवार देऊ नये. पण त्यांना काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाचं असं मत पडलं की तिथली मतं उद्धव ठाकरेंकडे जातील. त्यामुळे त्यांनी तिथे उमेदवार उभा केला आहे. पण आमची आधीपासून भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर पाठिंबा मागितला आहे, तर तो आपण दिला पाहिजे. आमचं कालही हेच मत होतं आणि आजही हेच मत आहे. सदा सरवणकरांबाबत आम्ही बसून बोलू तेव्हा ठरवू.
सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरांचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे यातले जास्तीत जास्त बंडखोर परत आपल्या बाजूला कसे आणता येतील, यासाठी आमचा प्रयत्न असेल. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.





