‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकरांचा संताप; म्हणाले, “आरोपीला फाशी द्या”

मुंबई | वरळीमध्ये झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाने संपूर्ण मुंबई हादरुन गेली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला भरधाव गाडीने धडक दिली. या अपघातामध्ये ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेली महिला ही ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची पुतणी होती. त्यामुळे या घटनेबाबत माध्यमांशी संवाद साधताना वाडकर यांनी आपली प्रतिक्रिया देत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
अभिनेते जयवंत वाडकर म्हणाले, या आरोपींना कठोर कायदा काढून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा पद्धतीने गाडी चालवणं ही केवळ विकृती आहे. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक माणसाला या सगळ्याची जाणीव पाहिजे. आपण गाडीसमोर साधा उंदीर जरी आला तरी थांबतो त्या प्राण्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. इथे तर तुमच्या गाडीसमोर एखादी व्यक्ती येते आणि तुम्ही तिला फरफटत घेऊन जाता ही गोष्ट किती वाईट आहे. त्यानंतर गाडी तशीच सोडून पळून जाणं हे आणखी वेदनादायी आहे.
हेही वाचा – विधानसभेला २०० पेक्षा जास्त घरे असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे
मी शासनाला एवढीच विनंती करेन की, कृपया या आरोपीवर दया दाखवू नका. कारण, तुमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तो रात्री बारमध्ये दारू प्यायला, अठरा हजारांचं बिल झालं. त्यावेळी मर्सिडीज गाडी होती मग, ही बीएमडब्ल्यू गाडी कुठून आली? त्याची मैत्रीण कोण आहे. याप्रकरणी शासनाने एकालाही सोडता कामा नये. मला पोलिसांवर विश्वास आहे आणि ते योग्य कारवाई करतील याची खात्री आहे. अशा लोकांना सोडू नये असं माझं प्रामाणिक मत आहे कारण, सध्या एका पाठोपाठ एक अशा घटना घडल्या आहेत, असं जयवंत वाडकर म्हणाले.
कावेरी माझी सख्खी पुतणी आहे. त्यामुळे याबद्दल मी अजून काय बोलू मला खरंच सुचत नाही. त्या पोरीची आता गणपतीमध्ये खूप आठवण येईल. तिने सगळं कष्ट करून हे उभं केलं होतं. त्यामुळे तिची आठवण मला कायम येत राहणार, असंही जयवंत वाडकरा यांनी सांगितलं.





