अरेरे हृदयद्रावक! विजेचा धक्का लागून नऊ गायींसह वासराचा मृत्यू
शेतकऱ्याचे सुमारे बारा लाखांचे नुकसान, पशुसंवर्धन खात्याने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मुळशीकरांची मागणी
वडगाव मावळः मुळशी तालुक्यातील कासारसाई येथे शेतकऱ्याच्या गोठ्यात घरातील विजेचा प्रवाह उतरून नऊ गायी आणि एका वासराचा मृत्यू झाला आहे. या नऊ गायींपैकी सहा गायी गाभण होत्या, अशी माहिती शेतकरी विनायक शिखरे यांनी इंद्रायणी वार्ताला दिली.
विनायक शिखरे म्हणाले गोठ्यात बारा जनावरे होती. त्यापैकी दोन बाहेर होती. ती सुरक्षित आहेत. मध्यरात्री पडलेल्या वादळी पावसाने विजेची तार गोठ्यावर पडली होती. रात्रीच्या सुमारास गावातील विद्युत प्रवाह बंद होता. सकाळी विद्युत पूरवठा सुरु झाल्यावर या गायींना विजेचा धक्का लागला. त्यात त्या मृत्यूमुखी पडल्या.
गायींच्या जीवावरच सुरू होता दुग्धव्यवसाय
या गाेठ्यास पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भेट दिली. त्यांनी गायींची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे विनायक शिखरे यांचे बारा लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या गायींच्या जीवावरच शिखरे यांचा दुग्धव्यवसाय सुरू होता. दरम्यान पशुसंवर्धन खात्याने पंचनामा करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुळशीतील शेतकरी करू लागले आहेत.





