अमित शाह यांच्या घरावर काढलेला शाहीन बाग आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी रोखला

गेल्या दोन महिन्यांपासून शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरावर मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा रोखला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेचं निमंत्रण आलं आहे का? चर्चेला जाणाऱ्या शिष्टमंडळात कोण आहेत? आदी प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी हा मोर्चा रोखला आहे.
सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन बाग चर्चेत राहिले. दरम्यान, अलिकडेच ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शाहीन बागेतील आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. “मी त्यांना (शाहीन बाग आंदोलक) सांगू इच्छितो की, त्यांनी माझ्या कार्यालयात येऊन वेळ घ्यावी. तीन दिवसाच्या आत मी त्यांना वेळ देईल. कुणालाही भेटण्यासाठी तयार असल्याचं मी सांगितलं. मात्र, कुणालाही चर्चा करायची नाही,” असं अमित शाह म्हणाले होते.





