16 जुलैपासून मुंबईचे “दुध बंद’
पुणे – दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्यशासन गंभीर नसल्याने “दुध बंद’ आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. शांततेने नाही तर तोडफोड केल्याशिवाय राज्य शासनाला जाग येणार नाही. त्यामुळे हा मार्ग स्विकारावा लागल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येत्या 16 जुलैपासून पुकारण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. ते म्हणाले, दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी पाच रुपये अनुदान मिळाले पाहिजे, अशी आमची पुर्वीपासूनची मागणी आहे. या मागणीसाठी 19 जून रोजी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला होता. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याने हे “दुध बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला येत्या 16 जुलैपासून सुरुवात होणार असून मुंबईला जाणारे दुध बंद करण्यात येणार आहे. मुंबईला साधारण रोज सत्तर लाख लिटर दुधाची मागणी असते. त्यातील निम्याहून अधिक दुध हे पश्चिम महाराष्ट्रातून जाते. हे आणि परराज्यातून येणारे दुधही बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी आमचे कार्यकर्ते सतर्क पाहारा देणार आहेत. आंदोलन काळात शेतकरी देखील सहकारी तसेच खासगी दुध संघांना दुध विकणार नाही. हे दुध शाळांमध्ये वाटण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी रस्त्यावर वाटण्यात येणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. राज्यशासन जोपर्यंत आमची मागणी पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.