15 पासून रेल्वे सुरू होणार की नाही ? रेल्वे मंत्रालयानं दिलं ‘हे’ उत्तर
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानंही लॉकडाउन संपेपर्यंत प्रवासी रेल्वे न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ पासून रेल्वे सुरू होणार की नाही असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. त्यावर रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या यासदंर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
लॉकडाउन पूर्ण झाल्यानंतर प्रवासासाठी आतापर्यंत कोणताही प्रोटोकॉल जारी करण्यात आला नाही. यासंदर्भात कोणताही निर्णय झाल्यास तो सर्वांना सांगितला जाईल, असंही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. याबाबत रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भात एक ट्विट सुद्धा केलं आहे.
ज्या प्रमाणे माध्यमांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे, त्याप्रमाणे रेल्वे मंत्रालयाकडून लॉकडाउन नंतर रेल्वे प्रवासाबाबत कोणताही प्रोटोकॉल जारी करण्यात आला नाही. यासंदर्भात काही निर्णय झाल्यास संबंधित विभागांना त्याबद्दल माहिती देण्यात येईल, असं त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, माध्यमांमध्ये आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार रेल्वेनं एक प्रोटोकॉल तयार केल्याचं सांगण्यात आलं होतं. यानुसार प्रवाशांना आपल्या प्रवासाच्या काही तास आधी रेल्वे स्थानकावर पोहोचावं लागेल, त्या ठिकाणी त्यांचं थर्मल स्क्रिनिंग केलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं.
रेल्वेनं यापूर्वीच २४ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान देशात प्रवासी रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून सध्या केवळ मालगाड्या सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यातच सध्या लॉकडाउन हटवण्याबाबत किंवा पुढेही सुरू ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.