२१ सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार! केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स जारी
नवी दिल्ली – कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालये आता येत्या २१ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार इयत्ता नववीपासून पुढचे वर्ग नियम आणि अटी पाळून अंशतः सुरू करता येणार आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमधील शाळा आणि महाविद्यालयांना यातून वगळले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मार्चपासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. परंतु अनलॉक-४ मध्ये त्या २१ सप्टेंबरपासून अंशतः सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच एसओपी जारी केल्या आहेत. त्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या आई-वडिलांच्या लेखी परवानगीनुसार हे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत शिक्षकांचे मतही लक्षात घेण्याची सूचना सरकारने केली आहे. त्यामुळे हा त्यांचा ऐच्छिक निर्णय असेल. कोरोनाच्या सर्व नियमांचे आणि सरकारच्या आदेशांचे पालन करून २१ सप्टेंबरपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू करता येणार आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा, महाविद्यालयाचे अन्य कर्मचारी यांना यात परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊ शकणार नाहीत.
ही शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या दक्षता घ्याव्या लागणार आहेत. त्यात शाळा आणि वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. याशिवाय ५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे शिक्षक आणि कर्मचारी ऑनलाईन शिक्षणाचे असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळा-कॉलेजमध्ये जाऊन आणि वर्च्युअल क्लासमधूनही शिक्षण घेता येणार आहे. शाळेत जाण्याचा निर्णय विद्यार्थी आणि पालकांचा पूर्णपणे ऐच्छिक आहे. शाळेतही सामाजिक अंतर आणि मास्क व इतर नियमांचे पालन करावे लागणार आहे.