हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याचा संघाचा प्रयत्न ; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
मुंबई | देशामध्ये हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याचा संघाचा प्रयत्न सुरु असल्याचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी संघावर आरोप केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी, एनआरपी आणि भारत सरकारच्या आर्थिक दिवाळखोरीविरोधात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील जवळपास ५० पेक्षा अधिक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र बंदला मुंबईमध्ये हिंसक वळण आले आहे. चेंबूर परिसरामध्ये बसची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड करणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाहीत, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. आंदोलन इंतरांकडून हिंसक केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, बंद शांततेत करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
हिंसक पध्दतीने आम्हाला आंदोलन नको. मात्र आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चेहरा लपवणारे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे. सीएए, एनआरसीला वंचित बहुजन आघाडीकडून कडाडून विरोध आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आंदोलना दरम्यान अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन आणि पोलीस सज्ज झाले आहेत.