“हा फक्त जिंकणं किंवा पराभवाचा मुद्दा नाही,” सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर रतन टाटांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई |
सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाचा १८ डिसेंबरचा निर्णय रद्द केला आहे ज्यामध्ये सारयस मिस्त्री यांना पुन्हा एकदा टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला दिलासा दिला असून सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या न्यायालयीन संघर्षांत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी महत्वाचा निर्णय दिला. दरम्यान रतन टाटा यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
रतन टाटा यांनी ट्विट करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून आभार मानले आहेत. हा जिंकणं किंवा पराभवाचा मुद्दा नसल्याचंही ते म्हणाले आहेत. “माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं मी स्वागत करत असून आभार मानतो. हा फक्त जिंकणं किंवा पराभवाचा मुद्दा नव्हता. माझ्या अखंडतेवर आणि ग्रुपच्या नैतिक आचरणावर सतत कठोर हल्ले झाल्यानंतर टाटा सन्सच्या सर्व मागण्यांना मान्यता देणारा निकाल हा या ग्रुपचे नेहमीच मार्गदर्शक तत्त्व राहिलेल्या मूल्यं आणि नैतिकता यांचं प्रमाणीकरण आहे,” असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे.
— Ratan N. Tata (@RNTata2000) March 26, 2021
राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाने टाटा समूहातील शंभराहून अधिक कंपन्या सांभाळणाऱ्या टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांच्या हकालपट्टीचा निर्णय बेकायदेशीर ठरवला होता. टाटा सन्सने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपाठीने दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयासंबंधी केलेल्या युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय टाटा सन्ससाठी मोठा विजय आहे.
VERDICT ALERT: TATA vs CYRUS MISTRY
CJI SA Bobde led bench to shortly deliver judgment in the dispute between Tata Group’s holding company, Tata Sons Limited and Shapoorji Pallonji Groups’ Cyrus Mistry#SupremeCourt @TataCompanies @CyrusMistrySupt pic.twitter.com/CJA892dY3U
— Bar & Bench (@barandbench) March 26, 2021
राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाच्या काय दिला होता निर्णय ?
सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष हे मूळ पद पुन्हा बहाल केले जावे, असं सांगून न्यायाधिकरणाने एन. चंद्रशेखर यांची त्या जागी केली गेलेली नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली होती. तथापि, टाटांना या निकालाविरोधात अपिलासाठी चार आठवडय़ांचा कालावधीही अपील न्यायाधिकरणाने बहाल केला होता. त्यानुसार टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात निर्णय़ाला आव्हान देण्यात आलं होतं.
२०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी
शापूरजी पालनजी या उद्योगघराण्याचे वारसदार असलेले मिस्त्री यांचा ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला होता. २०१२ साली त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. पुढे फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून काढून टाकण्यात आलं होतं.
टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला होता. जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि टाटा समूहातील कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्याकडून गैरव्यवस्थापन आणि दुराचार झाल्याचा त्यांनी याचिकेत केलेल्या आरोपातही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती.