स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 29 जूनला आसूड मोर्चा
कोल्हापूर– खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 29 जूनला महाराष्ट्रातील हजारो शेतकरी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर आसूड मोर्चा काढणार आहेत. शेतकऱ्यांच्या थकीत बिलाची रक्कम तात्काळ मिळावी या मागणीसाठी साखर आयुक्तांना जाब विचारून घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
ते कोल्हापुर येथील स्वाभिमानी पक्षाच्या अभ्यास शिबिर समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खासदार राजू शेट्टी यांनी थेट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत खरपूस समाचार घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचे 2 खासदार आणि 10 आमदार निवडून आणणार असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शेट्टी यांनी आव्हान दिले. आम्ही अंगावर घेतले कि शिंगावर घ्यायला कमी करत नाही, अशी स्वाभिमानीची पद्धत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात 2 खासदार आणि 10 आमदार तर सोडाच पण जिल्ह्यात भाजपा औषधाला देखील उरणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.