सोनिया गांधी-शरद पवार भेटीत सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार?
मुंबई | महाईन्यूज
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्याबाबत निर्माण झालेल्या पेचावर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात उद्या होणाऱ्या भेटीनंतर काही तरी तोगडा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यावरून काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीतही वेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्यावरून अजूनही काँग्रेसमध्ये निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादीमध्येही शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्याबाबत वेगेवगेळ मतप्रवाह आहेत. भाजपला सत्तेपासून दूर राखण्याकरिता एकत्र आले पाहिजे, अशी भावना काँग्रेस आमदारांनी व्यक्त केली. तर राष्ट्रवादीतील काही नेते लवकर तिढा सुटला पाहिजे यावर आग्रही आहेत. या पाश्र्वभूमीवर शरद पवार हे उद्या नवी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यावरून काँग्रेसचे अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. शरद पवार यांच्या भेटीतून काही तरी तोडगा निघेल, असा आशावाद व्यक्त केला जातो. या घोळास राष्ट्रवादीकडून काँग्रेसला दोष दिला जात असतानाच, काँग्रेसकडून राष्ट्रवादीबाबत साशंकता व्यक्त केली जाते. राष्ट्रवादीतही भाजपला मदत करावी, असे काही नेत्यांचे मत आहे.