सोनिया गांधींचे ‘ते’ पत्र दबावतंत्र नाही
खासदार संजय राऊत यांचा सोनिया गांधीच्या पत्रावर खुलासा
मुंबई | प्रतिनिधी
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाबाबत पत्र लिहिले आहे. मात्र त्यांच्या पत्राचे स्वागतच असून ते दबावतंत्र नसल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्षा आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवण्यात सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही खासदार राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सोनिया गांधीच्या पत्राचं स्वागत व्हावं. किमान समान कार्यक्रम महत्वाचा आहे. सरकारची गाडी रुळावर आली असल्याचं संजय राऊत यांनी या वेळी सांगितलं. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कोरोनामुळे मधल्या काळात किमान समान कार्यक्रमातील काही कामे मागे राहिली. सरकारी यंत्रणा कोरोनाच्या लढाईत व्यग्र असल्यामुळे कामे राहिल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली आहे. महाविकास आघाडीत दबावाचं राजकारण नसल्याचं राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र पालटलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे भिन्न विचारसणीचे पक्ष एकत्रित आले आहे.