सरकारी जागांवर धार्मिक कार्यक्रमांना अनुमतीचा विषय वरीष्ठ पीठाकडे सुपुर्त
नवी दिल्ली – सरकारी जागेवर किंवा मालमत्तांमध्ये धार्मिक कार्यक्रमांना अनुमती द्यायची की नाही या विषयावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने वरीष्ठ पीठाकडे सोपवला आहे. त्यासाठी सरन्यायाधिशांनी मोठे पीठ स्थापन करावे अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.
ज्योती जागरण मंडळाने या विषयी याचिका दाखल केली आहे. या मंडळाला दिल्लीतील माता की चौकी भागात जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यास स्थानिक प्रशासनाने अनुमती नाकारली आहे त्यावरून त्यांनी वरीष्ठ न्यायालयात धाव घेतली आहे. हा विषय अधिक न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे सुपुर्त करण्याचा निर्णय न्या आर. एफ नरीमन आणि न्या इंदु मल्होत्रा यांच्या खंडपीठाने घेतला आहे.
भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे सरकारी जागांवर धार्मिक कार्यक्रमांना अनुमती द्यावी की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ज्योती जागरण मंडळाला चंचल पार्क मायापुरी येथे धार्मिक कार्यक्रम करण्यास हरित लवादाने अनुमती दिली होती. पण नंतर त्यांची ही अनुमती काढून घेण्यात आली. त्यामुळे या संघटनेला हा कार्यक्रम रस्त्यावर करावा लागला होता.