समृद्धी महामार्गासाठीचा मुहूर्त ठरला… लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी येण्याची शक्यता
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त काढला असल्याची शक्यता आहे. महामार्गाच्या लोकापर्णाचा आतापर्यंत दोनवेळा हा मुहूर्त हुकला असून, आता दिवाळीत पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार असून, त्यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिमहत्त्वकांक्षी असलेला मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाची घोषणा ३१ जुलै २०१५ रोजी विधानसभेत केली होती. १० जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गाचा फायदा महाराष्ट्रातील तब्बल २४ जिल्ह्यांना होणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या ८ तासांत करता येणार असून ८१२ किमीचं अंतर ७०० किमीपर्यंत येणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या लोकापर्णाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान, नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचं काम केव्हाच पूर्ण झालं आहे. या पहिल्या टप्य्याचं लोकार्पण ऑक्टोबर २०२१ मध्ये करण्यात येणार होतं. मात्र तेव्हा होऊ शकलं नाही. त्यानंतर, ३१ डिसेंबर २०२१ रोजी उद्घाटन होण्याची शक्यता होती. मात्र, तेव्हाही लोकार्पण झाले नाही. त्यानंतर १ मे २०२२ रोजी उद्घाटन होणार असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, त्यावेळी तो मुहूर्त हुकला. त्यानंतर, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता होती. मात्र, तेव्हाही हा कार्यक्रम होऊ शकला नाही. आता, समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन दिवाळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. यावेळी तरी उद्घाटन होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वाहतुकीची मालिका
महामार्ग अद्याप वाहनांसाठी खुला झाला नसतानाही येथे अपघाताची (Accident) संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या महामार्गाच्या उद्घाटनाची प्रतिक्षा केली जात आहे.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्य
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना २०१५ साली या प्रकल्पाची घोषणा केली होती. ५० हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. तसेच, या समृद्धी महामार्गासाठी पन्नास हजार एकर जमिनीचा वापर करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गात ५० पेक्षा जास्त उड्डाणपूल असणार असून २४ हून अधिक इंटरचेंजेस वे आणि ५ बोगदे प्रस्तावित आहेत.
समृद्धी महामार्गामुळे राष्ट्रीय महामार्ग जोडले जाणार आहेत. यामध्ये NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.
या महामार्गामुळे २६ तालुके, ३९२ गावांना जोडण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. २५ लाख रोजगाराची संधी यामुळे उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं आहे.
हा महामार्ग खासगी भागीदारीतून बनवण्यात येणार असल्याने टोल द्यावा लागणार आहे.