संजय राऊतांचा खासदार राहुल शेवाळेंवर निशाणा, म्हणाले, बलात्काराचे आरोप असलेल्यांनी आदित्य ठाकरेंवर बोलू नये
नवी दिल्ली ः ज्या व्यक्तीवर बलात्कारापासून विनयभंगापर्यंत आरोप आहेत अशा व्यक्तींनी आदित्य ठाकरेंवर आरोप करू नयेत, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. काल लोकसभेतही शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसंच, तुमच्या घरातून सुद्धा अशा फायली निघतील, असा इशाराच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
आदित्य ठाकरेंवर आरोप करणे म्हणेज हलकटपणा आणि नीचपणा आहे. सुशांतसिंह मृत्यूप्रकरण तेव्हाच्या विरोधी पक्षाने अशा पद्धतीने उभं केलं की शेवटी ते त्यांच्यावरच उलटलं आहे. सीबीआयसह अनेक तपास यंत्रणांनी तपास केला आहे. सुशांतची आत्महत्याच होती हे सीबीआयने सांगितलं आहे. ज्यांचावर बलात्कारापासून विनयभंगाचा आरोप आहेत, कालपर्यंत शिवेसनेच्या ताटात जेवत होते अशा व्यक्तीने आदित्य ठाकरेंवर आरोप करणे म्हणजे कुटीर लोक आहेत. ते किती खालच्या थराला गेले आहेत, किती वैफल्यग्रस्त आहेत हे स्पष्ट दिसतंय, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
नागपूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांवर भूखंड भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. त्याला तोंड देताना सरकारची धावपळ आणि पळापळ सुरू आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्याच्या भ्रमात सरकार आहे. पण हे सरकार भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलं आणि ते भ्रष्टाचाराच्या ओझ्यानेच पडेल, असं टीकास्त्र राऊतांनी सोडलं.
सुशांतसिंह प्रकरणात बिहार पोलिसांचा संबंध काय? महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, बिहार पोलीस तपास करणार का? बिहार पोलीस त्यांच्या राज्यात. सीबीआयने क्लिनचीट दिल्यावर बिहार पोलिसांचा संबंध काय येतो असं म्हणत संजय राऊतांनी बिहार पोलिसांच्यावर चौकशीवरही ताशेरे ओढले. हे प्रकरण ज्यांनी काढलं आहे, त्यांनी स्वत:चा अंतरआत्मा पाहावा. जी व्यक्ती त्या सभागृहाचा सदस्य नसते, त्याच्यावर बोलता येत नाही. विषय काय होता आणि आपण बोलला काय? हे सगळं ठरवून चाललं असल्याचे राऊत म्हणाले.