संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं, खचून जायचं नसतं !
सातारा – गेले अनेक महिने देशात केवळ लोकसभा निवडकीचा ज्वर आहे. देशभरात ७ टप्प्यात झालेली लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर निकालाची प्रतिक्षा. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यातील भीषण दुष्काळकडे दुर्लक्ष झाले. मात्र, आता निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील नेत्यांनी या समस्येकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. “संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं”, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळग्रस्तांना या धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवार यांनी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी आणि नागेवाडी या गावांना भेट दिली. यावेळी ते बोलत होते. “संकट आलं म्हणजे काय नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं. संपूर्ण महाराष्ट्रात आज भीषण दुष्काळी परिस्थिती आहे, काळ कठीण आहे. मात्र आपण हरायचं नाही. या संबंधी आपण राज्य शासनाकडू मदत घेऊन पुन्हा हे संकट येणार नाही यासाठी प्रयत्न करू”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.