शेतकऱ्याची अवहेलना! कर्ज २४ हजार, माफ झालं फक्त १३ रूपये
मध्य प्रदेशमध्ये सत्तास्थापनेनंतर काँग्रेस सरकारने दोन तासांत कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु, कमलनाथ सरकारची ही कर्जमाफी फसवी असल्याचे समोर येत आहे. मालवा जिल्ह्यातील बैजनाथ निपानिया गावातील एका शेतकऱ्याच्या नावावर २४ हजार रूपयांचे कर्ज होते. मात्र, माफ झाले फक्त १३ रूपये.
शेतकरी शिवलाल कटारिया यांनी याबाबत दुख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ‘राज्य सराकरने दोन लाख रूपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली होती.कर्जमाफीची प्रकिया मी पूर्ण केली. सर्व कर्जमाफ होईल अशी आशा होती. मात्र, ग्रामपंचायतमध्ये आलेल्या सुचनेनुसार, फक्त १३ रूपये कर्जमाफ झाले आहे. जर सरकार कर्ज माफ करत असेल तर पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, 13 रुपये 5 रुपये एवढ्या पैशांची तर आम्ही विडी पितो, अशा शब्दात या शेतकऱ्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.’ कर्जमाफीमध्ये गोंधळ झाला आहे, याबाबत संबंधित आधिकाऱ्याकडे तक्रार देण्यात आली असल्याचे कर्मचाऱ्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
कर्जमाफीसाठी ‘जय किसान कर्जमुक्ती’ योजनेंतर्गत शेतकरी अर्ज भरत आहेत. मात्र, या कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या ज्या याद्या लावण्यात आल्या आहेत. कुणाचे पाच तर कुणाचे दहा रुपये माफ झाले असल्याची स्थिती मध्य प्रदेशात दिसत आहे.