breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिरूरच्या आखाड्यात “शिवाजी विरूध्द ‘संभाजी’” संघर्ष?

  • डॉ. कोल्हेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर समिकरणे बदलली
  • खासदार आढळराव पाटलांना निवडणूक जड जाणार

अमोल शित्रे


पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवसेना संपर्क प्रमुख आणि उपनेते राहिलेले डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्याने शिरूर लोकसभा मतदार संघातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. शिरूरचे विद्यमान शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ही खेळी मानली जात आहे. “स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या डॉ. कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यास शिरूरच्या पाटलांना ही निवडणूक चांगलीच जड जाणार आहे. अभिनेते कोल्हे यांना पक्षात घेऊन शिरूरच्या राजकीय रणांगणात “शिवाजी विरुध्द संभाजी” असा संघर्ष घडवून आणण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत.

सलग तीनवेळा शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूरचा गड राखण्यात यश आले आहे. त्यांना नेस्तनाबूत करण्याचा राष्ट्रवादीकडून अनेकदा प्रयत्न झाला. परंतु, तो यशस्वी ठरला नाही. यात माजी आमदार विलास लांडे यांचा हाकनाक बळी देण्यात आला. आता पुन्हा लांडे यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. होर्डींग्ज आणि फ्लेक्सच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून आढळराव यांच्यावर त्यांनी नेम धरला आहे. आढळरावांनी परवा पालिकेत पत्रकार परिषद घेऊन लांडे यांच्या कृत्याचा समाचार घेतला. या आरोप प्रत्यारोपांमुळे खासदार आढळराव विरूध्द लांडे असा कलगीतुरा रंगलेला असताना काल अचानक डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने शिरूर मतदार संघाची राजकीय समिकरणेच बदलली आहेत. कोल्हे यांना राष्ट्रवादीतर्फे शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरवले जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक माजी आमदार लांडे यांच्या प्रचाराची गती कालपासून चांगलीच मंदावली आहे. सोशल माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता, त्याला आता खीळ बसल्याचे दिसत आहे.

अभिनेते अमोल कोल्हे हे शिवसेनेचे संपर्क प्रमुख होते. पक्षाचे उपनेते हे बलाड्य पद त्यांच्याकडे असताना त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे माजी आमदार विलास लांडे यांना धक्का बसला आहे. तर, शिरूरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढील राजकीय अडचणींत वाढ झाली आहे. कारण, “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेतून कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. शिवभक्तांच्या मनामध्ये त्यांनी मालिकेच्या माध्यमातून अनोखे स्थान तयार केले आहे. त्यांची लोकप्रियता प्रभावशाली असल्यामुळे खासदार आढळराव पाटील यांच्या विरूध्द राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे कोल्हे यांना पक्षात घेऊन शिरूरच्या आखाड्यात ‘शिवाजी विरूध्द संभाजी’ असा संघर्ष घडवून आणण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.


विलास लांडे यांचा पत्ता कट

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरच्या आखाड्यातून तळ्यातमळ्यात असा सूचक इशारा देणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शेवटच्या क्षणी लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, डॉ. अमोल कोल्हे यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांच्या मनात पक्षाविषयी नैराश्य निर्माण होणे गैर नाही. जर, कोल्हे यांना शिरूर मतदार संघासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. तर, माजी आमदार लांडे यांचा पत्ता कट होणार यात शंकाच नाही. विशेष म्हणजे त्यांच्यावर कोल्हे यांचा प्रचारक म्हणून काम करण्याची जिम्मेदारी पक्षाने दिली तर ती जबाबदारी लांडे स्वीकारतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button