शहराच्या औद्योगिक विकासात उत्तर भारतीयांचे योगदान – महापौर राहुल जाधव
- छटपुजेनिमित्त मोशीत इंद्रायणी घाटावर गंगा आरती संपन्न
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवडचे नाव देशातील नकाशावर ‘मिनी इंडिया’ म्हणून घेतले जाते. शहराचा औद्योगिक विकास होण्यामध्ये उत्तर भारतीयांचे योगदान महत्वपुर्ण आहे. उद्योग व्यवसायानिमित्त मागील चाळीस पन्नास वर्षांपासून देशातील विविध प्रातांतून नागरीक येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्राच्या विविध सण, उत्सवात सहभाग घेत उत्तर भारतीयांनी आपली स्वत:ची संस्कृती जोपासत येथील मातीशी जूळवून घेतले. आपल्या कुटूंबाचा, समाजाचा, देशाचा विकास व्हावा, ही मनोकामना पुर्ण होण्यासाठी उत्तर भारतीय महिला सलग अठ्ठेचाळीस तास सूर्याची उपासना करीत छटपुजेचे व्रत करतात. हा उत्सव म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.
छटपुजेनिमित्त विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर मंगळवारी (दि. 13) आणि बुधवारी भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या उत्सवात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, माजी नगरसेवक संजय वाबळे, धनंजय आल्हाट, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे आदींसह शेकडो उत्तर भारतीय नागरीक उपस्थित होते. यावेळी सुरेश चव्हाण यांना राष्ट्रनिर्माण पुरस्कार, शामजी महाराज यांना हिंदू भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी लालबाबू गुप्ता म्हणाले की, वाराणशी (काशी) येथील गंगेच्या घाटावर ज्याप्रमाणे गंगेची आरती करण्यात येते त्याप्रमाणे मोशीत इंद्रायणी घाटावर मागील वर्षीप्रमाणे वाराणशी (काशी) येथील पुरोहितांच्या हस्ते भव्य गंगा आरती करण्यात आली. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याचे प्राचिन काळापासूनची सामाजिक धारणा आहे. निसर्गात आणि समाजात एकरूपता साधणार्या या व्रतात, आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे. सुर्य षष्ठीला सुर्यास्ताच्या मुहूर्तावर सुर्यनारायणाला हजारों महिलांनी अर्घ्य दिले. सर्व उत्तर भारतीय कुटूंबातील महिला जल, जमिन आणि जगंलाचे रक्षण संवर्धन व्हावे यासाठी सुर्य षष्ठी व्रत करतात. नदी किनारी येऊन वसुंधरेप्रति प्रेम भावनेने समर्पित होऊन दिवाळी नंतर सहाव्या दिवशी सुर्य नारायणाची उपासना, पुजा करुन त्याचे गुणगाण गातात. मानवाच्या जीवनातील निसर्गाचे व नदीचे महत्व लक्षात घेऊन नदी घाटावर श्रध्दापुर्वक पुजा विधी करतात. महिला आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी या दिवशी निर्जला व्रत करुन दुस-या दिवशी पहाटे सप्तमीला सुर्योदयावेळी सुर्यनारायणास अर्घ्य देऊन प्रसाद ग्रहण करुन उपवास सोडतात.
यावर्षी महोत्सवात इंद्रायणी नदी संवर्धनाचा संकल्प करीत विश्व श्रीराम सेनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उर्त्स्फुतपणे स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये महापौर राहुल जाधव यांनी श्रमदान केले.
कार्यक्रमाच्या आयोजनात प्रमोद गुप्ता, अक्रम शेख, शामबाबू गुप्ता, सुनिल सिंग, मुन्ना सिंग, रोहित प्रसाद, विनोद गुप्ता, धनंजय गुप्ता, शेखर गुप्ता, किरण गायकवाड, पृथ्वी प्रसाद, सत्यम गुप्ता, विकास गुप्ता, रोहिदास कराटे, राधेशाम गौतम आदींनी सहभाग घेतला.
सुत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले. आभार प्रमोद गुप्ता यांनी मानले.