विहिंपचा इशारा ; राम मंदिराला विरोध करेल, तो संपेल
अहमदनगर: ‘अयोध्येत राम मंदिर होणारच. हिंदू समाज हे मंदिर उभारणार असून जो कुणी राम मंदिराला विरोध करेल तो संपेल,’ असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव मिलिंद परांडे यांनी आज विरोधकांना दिला. परांडे नगरमध्ये बोलत होते.
रामाचे मंदिर कुठलेही सरकार किंवा कुठला राजकीय पक्ष बांधणार नाही तर हिंदू समाज बांधणार आहे, असे ते म्हणाले. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या राम मंदिराच्या खटल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या खटल्यात सगळे पुरावे हिंदूंच्या बाजूने असल्यामुळे निकाल विहिंपच्या बाजूनेच लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘राम हा काही फक्त मंदिरापुरता मर्यादित नसून राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. भाजप याचा फायदा करून घेत आहे असे वाटत असेल तर इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन मंदिर बांधावे,’ असे आवाहन परांडे यांनी यावेळी केले. राम मंदिरासाठी झटणाऱ्या संतांचे, संस्थांचे आभारही त्यांनी मानले. यावेळी त्यांनी एमआयएम आणि इतर इस्लामिक संघटनांवर टीकाही केली. एमआयएम इस्लामिक दहशतवादाला चिथावणी देत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर, देशात सातत्यानं केल्या जाणाऱ्या हिंदूंच्या धर्मांतराबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली.